धर्मावर होणारे हल्ले रोखणारा धर्मयोद्धा हरपला ! – हिंदु जनजागृती समिती
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
धर्माचे पालन । करणे पाखंड खंडण ॥ हा धर्मरक्षणाचा बीजमंत्र घेऊन अखंडपणे कार्यरत राहणारे वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू पूज्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या देहत्यागामुळे धर्मावर होणारे हल्ले रोखणारा एक लढवय्या धर्मयोद्धा हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत हिंदु जनजागृती समितीने आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले पूजनीय वक्ते महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरातील मुक्ताई मठात राहून महाराष्ट्रभरात धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे मोठे कार्य केले. कीर्तन-प्रवचनांतून, तसेच अनेक जाहीर सभांतून पूज्य वक्ते महाराज यांनी तरुणांमध्ये धर्मप्रेम वाढवण्यासह धर्मद्रोही विचारांचे खंडणही केले आहे. वारकरी संप्रदायातील संतविभूती म्हणून परिचित असलेल्या महाराजांचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी जवळाचे संबंध होते. धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असो कि पुरोगामी-नास्तिकांनी धर्मावर केलेली टीका असोत या सर्वांच्या विरोधात पूजनीय वक्ते महाराज मैदानात उतरले. अनेक प्रसंगी पदरमोड करून महाराष्ट्रभरात जनजागृती केली.
दरवर्षी आळंदी, पंढरपूर वा पैठण येथे वारकरी अधिवेशन बोलावून हिंदु धर्मावर होणार्या विविध आघातांच्या विरोधात लढण्यासाठी ते वारकर्यांना कृतीशील करत असत. त्यांचे वय झालेले असतांना ऊन, वारा, पाऊस, थंडी आदींचा विचार केला नाही. धर्मरक्षणासाठी कार्यरत राहणार्या या संतविभूतीचा सन्मान करण्याचे भाग्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना लाभले. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे (पूज्य) शिवाजी वटकर यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला.
पूज्य वक्ते महाराज यांचा वेद, स्मृती, पुराणे आदींचा केवळ गाढा अभ्यास नव्हता, तर ते चालते-बोलते विद्यालयच होते. तसेच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे लिखाणही केले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनावर टीका करणारे असोत कि हिंदूंच्या धर्मग्रंथांवर अश्लाघ्य टीका करणारे नास्तिक असोत, महाराजांच्या सडेतोड वैचारिक प्रहारांतून कोणीही सुटत नसे. पूज्य वक्ते महाराजांनी अनेक वारकर्यांमध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांनाही धर्मरक्षणासाठी कृतीशील केले आहे. पूज्य वक्ते महाराजांचे हे धर्मरक्षणाचे कार्य पुढे चालवणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल !








Be First to Comment