मुंबई प्रतिनिधी:
कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा सोमवार (दि. 23) पासून सुरू होत आहेत. शाळा सुरू करत असताना शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक असल्यामुळे शाळा दोन सत्रांत भरविण्याबाबत चर्चा सुरू आहेत.
कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वात प्रथम शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर सर्वात शेवटी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत असताना शासनाने त्यासंदर्भात आदेश काढून शाळांनी घ्यावयाच्या काळजीबाबत दिशानिर्देश स्पष्ट केले.
शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, शाळेत सॅनिटायझर ठेवावे, विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करत असताना त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्स राहील याची खबरदारी घ्यावी आदी सूचना दिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांनादेखील कोरोना (आरटी-पीसीआर) चाचणी करून घेण्याचे सक्तीचे केले आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून झाली आहे.
शाळा सुरू करत असताना त्यातील अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. शासनाने एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याची व वर्गात 50 मुलांपेक्षा अधिक मुले बसवू नयेत, अशी अट घातली आहे. जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळांमध्ये फारसा पट नसतो. काही शाळांमध्ये पट अधिक आहे. मात्र, अशा शाळांची संख्या फार कमी आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळणे अडचणीचे होणार आहे. काही खासगी शाळांत एका वर्गामध्ये 60 ते 70 विद्यार्थी असतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एका वर्गात त्यांना बसविणे शक्य होणार नसल्याने दोन सत्रांत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी सध्या तरी हाच मार्ग असल्याचे शिक्षण संस्थांचालकांमधून सांगितले जात आहे. परंतु, त्याला शिक्षक कितपत सहमत होतात, यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत.
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
मुलांना शाळेत पाठवत असताना पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे. त्याशिवाय शाळेमध्ये मुलांना घेतले जाणार नाही. त्यामुळे हे संमतीपत्र देण्यास पालक कितपत तयार होणार, हा खरा प्रश्न आहे.






Be First to Comment