
अन्यथा २५ डिसेंबरपासून विमानतळ बंद ? खासदार बाळ्या मामांचा सरकारला ‘अल्टिमेटम’
मुंबई प्रतिनिधी ( सतीश पाटील)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रान पेटले आहे. जर तातडीने नावाची घोषणा झाली नाही, तर २५ डिसेंबरपासून या विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, असा सज्जड दम भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिला आहे.
सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबरला दिलेल्या आश्वासनानुसार नामांतराचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, ३ डिसेंबरला दोन महिने पूर्ण होत असूनही अद्याप हालचाल नाही. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले असले तरी, केंद्रीय मंत्रिमंडळात हा प्रस्ताव अद्याप चर्चेलाही आला नसल्याचा दावा खा. म्हात्रे यांनी केला आहे.
सरकारच्या विलंबाचा निषेध करण्यासाठी २२ डिसेंबरला माणकोली नाका ते नवी मुंबई विमानतळ अशी पदयात्रा काढण्यात येईल. ही यात्रा २४ डिसेंबरला विमानतळावर धडकेल. जर मागणी मान्य झाली नाही, तर २५ डिसेंबरला विमानतळाचे कामकाज रोखून धरण्याचा ठराव भूमिपुत्रांनी केला आहे. या पत्रकार परिषदेस चारही सागरी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह अनेक भूमिपुत्र उपस्थित होते.





Be First to Comment