छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक शौचालय तोडण्याबाबत प म पा ने पुनर्विचार करावा : काशिनाथ पाटील
सिटी बेल | पनवेल |
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक शौचालय संकुल तोडण्याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव झाल्याचे सूत्रांकडून समजते. हे शौचालय जरी पनवेल महानगरपालिका हद्दीत असले तरी देखील त्याचा सगळ्यात जास्त वापर पनवेल तालुक्यातील ग्रामीण जनतेला होतो. बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामीण विभागातील नागरिकांचे वापरासाठी हे शौचालय अत्यंत निकडीचे समजले जाते त्यामुळे ते हटविण्याबाबत पनवेल महानगर पालिकेने पुनर्विचार करावा असे स्पष्ट मत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी मांडले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काशिनाथ पाटील म्हणाले की. सदर शौचालयाचे बाबतीत सर्वाधिकार हे पनवेल महानगरपालिकेचे आहेत. परंतु असे असले तरी जनभावना ध्यानात घेता या शौचालय संकुलाचा सगळ्यात जास्त वापर हा पनवेल तालुक्यातील ग्रामीण विभागातील जनता, आदिवासी बांधव हे करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या शौचालयाचा वापर आजूबाजूचे नागरिक अथवा पनवेल शहरातील नागरिक अभावानेच करत असावेत. परंतु पनवेल बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक, शेतमाल विक्रीसाठी येणारे आदिवासी, ठाकूर,कातकरी बांधव यांना सार्वजनिक शौचालयाची निकड भासते अशावेळेस त्यांना हे शौचालय वरदान ठरते.तसेच शाळा, शिकवण्या, न्यायालये , शासकीय कार्यालये, बँक अशा आस्थापनांमध्ये कामासाठी येणाऱ्या ग्रामीण विभागातील नागरिकांना देखील हे सार्वजनिक शौचालय जरुरी आहे. त्यामुळे सदरचे सार्वजनिक शौचालय संकुल पाडण्याबाबत पनवेल महानगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे बाबत पुनर्विचार करावा अशी मी मागणी करतो.
या पार्श्वभूमीवर काशिनाथ पाटील यांनी दिलेला इशारा खूप बोलका आहे. “प्रशासनाने अरेरावी करून जर सार्वजनिक शौचालय हटविण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ग्रामीण विभागातील नागरिकांच्या सह विचार विनिमय करून आंदोलन करण्याबाबत आढावा बैठक घ्यावी लागेल.”
Be First to Comment