- देशातील प्रमुख कंटेनर पोर्ट जेएनपीटीने स्वच्छ आणि हरित पोर्ट बनण्यासाठी घेतली शपथ 🔷🔷🔶🔶
- सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील ) : 🔶🔷🔷🔶
- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशनला पाठिंबा देण्यासाठी जेएनपीटी मध्ये ‘स्वच्छता पखवाडा’ साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता क्रांतीच्या अभियानामध्ये सामील होत जेएनपीटीच्या कर्मचार्यांनी पोर्टला स्वच्छ ठेवण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे व त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची शपथ घेतली.
स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छतेच्या विविध उपाययोजना करीत जेएनपीटी ने पोर्ट टाउनशिप, हॉस्पिटल, गेस्ट हाऊस, बल्क ऑफिस एरिया, प्रशासन भवन, मुख्य जेट्टी क्षेत्र, लँडिंग जेट्टी, आयसीडी कार्यालय, बीपीसीएल कार्यालय, लिक्विड कार्गो जेट्टी तसेच जवळपासच्या भागात सफाई व स्वच्छता मोहीम हाती घेतली.
स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जेएनपीटी आपल्या साधनसंपत्तीच्या रुपाने योगदान देत आहे आणि त्याच अनुषंगाने 16 सप्टेंबर, 2020 ते 30 सप्टेंबर, 2020 या कालावधीत “स्वच्छ भारत पखवाडा” साजरा केला जात आहे. कोविड – 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि नौकानयन मंत्रालयाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे “स्वच्छ भारत पखवाडा” आयोजना दरम्यान पालन करण्यात येत आहे. तसेच, लॉकडाउनच्या कालावधीत, जेएनपीटीने प्रतिबंधक उपाय म्हणून आसपासच्या सर्व गावात व्यापक जंतुनाशक फवारणी केली व स्वच्छता मोहीम सुद्धा राबविली आहे.
स्वच्छतेच्या योग्य पद्धतींबाबत कर्मचार्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी जेएनपीटीने मोक्याच्या ठिकाणी बॅनर व विविध चिन्हांचे फलक लावले आहेत, तसेच कर्मचार्यांना स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. स्वच्छता पखवाडा आयोजना दरम्यान जेएनपीटीने आपल्या कर्मचार्यांसाठी निबंध लेखन व घोषणा लेखन स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या आहेत.
जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. भारतातील मुख्य बंदरांमध्ये होणाऱ्या एकंदर कंटेनर कार्गो वाहतुकीच्या सुमारे 52% कामकाज जेएनपीटी येथे चालते. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.
सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.
Be First to Comment