कृष्णा, पंचगंगा नद्यांतील अतिरिक्त जल सांगली, सोलापूरमध्ये
सिटी बेल लाईव्ह/ पुणे
सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील धरणांमधून कृष्णा, पंचगंगा नद्यांमधून सोडलेले पाणी उपसा करून ते सांगली आणि सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी भागांत पोहोचवण्यात येत आहे. या भागातील टेंभू, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून हे पाणी उपसा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्य़ातील धरणे भरल्यानंतर विसर्गाचे पाणी कृष्णा, पंचगंगा नद्यांमधून पुढे कर्नाटकात जाते. पावसाळ्यात विसर्गाचे काही पाणी दुष्काळी भागात वळवण्याबाबत जुनी मागणी होती. त्याबाबत जलसंपदाच्या पुणे विभागाकडून काम सुरू होते.
सातारा जिल्ह्य़ातील टेंभू आणि सांगली जिल्ह्य़ातील म्हैसाळ योजनांद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. कडेगाव, तासगाव, विटा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तर सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला, मंगळवेढा या ठिकाणच्या तलावांत हे पाणी सोडण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग सुरू असेपर्यंत पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे.
‘म्हैसाळ योजना जुनीच आहे. २०१७-१८ या वर्षांत या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विभागाला मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाला. या योजनांमधून इतर भागांसह आता सांगोला, मंगळवेढा, जत या दुष्काळी भागात पाणी दिले जात आहे.’, अशी माहिती औरंगाबाद येथील जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक ता. ना. मुंडे यांनी दिली.
कार्यवाही सुरू : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांमधून दुष्काळी भागासाठी पाणी दिले जाते. या योजनांमधूनच पावसाळ्यात विसर्ग करतेवेळी पाणी देण्याची मागणी दुष्काळी भागाकडून सातत्याने करण्यात येत होती. पाणी उपसा करण्याच्या खर्चावरून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. मात्र, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यंदा निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दुष्काळी भागातील ६५ तलाव आणि १०० पेक्षा जास्त बंधारे भरले जाण्याची शक्यता आहे.
Be First to Comment