जनतेचे आशीर्वाद आणि प्रार्थनांमुळे जीव वाचल्याची दिली प्रतिक्रिया
सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रथम अमरावती, नंतर नागपूर आणि त्यानंतर मुंबईला हालविण्यात आले होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आज त्यांना आयसीयुमधून सामान्य कक्षात हालविण्यात आले. ‘मरता मरता वाचले, कारण माझ्यासोबत जनतेचे आशीर्वाद आणि प्रार्थना होत्या’, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.
आज सोशल मिडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार नवनीत म्हणतात, आज दुपारी मला आयसीयीमधून सामान्य कक्षात आणण्यात आले. आता माझी प्रकृती स्थिर आहे. गेल्या पाच सहा दिवसांचा माझा प्रवास अतिशय वेदनादायक होता.
अमरावती – नागपूर आणि नागपूरहून मुंबईच्या लीलावती रुग्णालयाचे आयसीयू असा हा प्रवास राहिला. लोकं माझी काळजी करीत होते. माझी काळजी करणाऱ्यांना आणि माझ्या लहान मुलांना या व्हिडिओतून दिलासा मिळणार आहे. आता लवकरच मी कामाला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास या बळावर खासदार नवनीत यांनी कोरोनावर मात केली.त्यांच्या स्वास्थविषयक नाजूक काळात त्यांचे सर्वधर्मीय-सर्वजातीय पदाधिकारी-कार्यकर्ते-हितचिंतक व स्नेहीजन यांनी आपआपल्या श्रध्दास्थळावर आमदार रवी राणा-खासदार नवनीत राणा यांची प्रकृती सुधारण्यासाठी मनोभावे प्रार्थना केल्या होत्या. आज त्या प्रार्थना सत्कारणी लागल्या. कोरोनासारख्या या महाभयंकर आजारावर मात करून नवनीत रवी राणा या आता जणू मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत. जीवन-मरणाच्या संघर्षात त्यांना न्याय मिळाला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजून काही दिवस त्यांना लीलावतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, याची खंत व्यक्त करून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
खुप वेदना होतात
कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेणे, हाच या महामारीवरील उपाय आहे. कारण या आजारात प्रचंड वेदना होतात. त्यामुळे कुणीही कोरोनाला सहजतेने घेऊ नये. उपचार करणारे डॉक्टर्स हे ईश्वराचे रूप असून या महाभयंकर आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनी शासकीय निर्देशांचे पालन करावे-काळजी घ्यावी व कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये, असे कळकळीचे आवाहन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
Be First to Comment