Press "Enter" to skip to content

शरद पवारांच्या घरावर पडणार श्रीराम लिहिलेल्या पत्रांचा पाऊस

भाजपा कार्यकर्ते पाठवणार तब्बल दहा लाख पत्रे

प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला पनवेल येथून आंदोलनास प्रारंभ

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल #

महत्प्रयासाने उभे राहणाऱ्या अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे मंदिर म्हणजे तमाम हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा विजय आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या येथील श्रीराम जन्म स्थानावर भव्य मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या विषयाचे राजकीय टायमिंग साधत, "मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का?" असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वादंग ओढावून घेतला आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना प्रभु श्रीरामांची आठवण करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी "श्रीराम" असे लिहून शरद पवार यांना पत्र पाठवण्याच्या आंदोलनास आज पनवेल येथून प्रारंभ केला. याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विक्रांत पाटील म्हणाले की, देशातील तमाम हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असणारे अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी होत आहे.त्याबद्दल सन्माननीय शरद पवार यांनी विवादात्मक विधान केले आहे. ते आमच्यासाठी सुद्धा सन्माननीय आहेत. परंतु एवढे मोठे जाणते आणि सन्माननीय नेते असे विधान चुकून करणे शक्यच नाही,त्यामुळे या विधाना पाठी कुठेतरी नागरिकांना भ्रमित करण्याचा आणि राजकारण करण्याचा विचार आहे असा आम्हाला संशय येतो. प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीच्या बाबत जर कुणी नकारात्मक वातावरण तयार करणार असतील तर भाजपा युवा मोर्चा हे सहन करणार नाही. जे जे प्रभु रामचंद्रांचे नाव विसरतील त्यांना त्याची आठवण करून देण्याचे काम आम्ही करू. त्याच उद्देशाने राज्यभरातून 10 लाख "श्री राम" असे लिहिलेली पत्रे पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आम्ही धडणार आहोत.

विक्रांत पाटील यांनी खणखणीत इशारा देताना सांगितले की आमच्या अस्मितेचा अपमान करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. पुढे पवारांना प्रतिप्रश्न करताना ते म्हणाले की कोरोनाविषाणू चे उच्चाटन होण्यासाठी काय करावे? हे तुम्हाला जर ठाऊक असेल तर ते तुमच्या राज्य सरकार ला का नाही सांगत? महविकास आघाडी कोरोना महामारी रोकण्यात पूर्ण अपयशी ठरत असल्याचे आरोप करत तीन पायांची शर्यत असणाऱ्यांनी महाराष्ट्राला covid बाबतीत टॉप वर नेल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच राज्यात विदारक परिस्थिती असल्याचे म्हटले.
महाआघाडी सरकारने लाखो रुपयांच्या गाड्यांची खरेदी केल्याने कोरोना जाणार होता का? अशी कोपरखळी त्यांनी लगावली.पवारांच्या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की,भगवंताच्या चरणी जाण्याने कोरोना जाणार नाही म्हणता तर मग तुमच्या आघाडी चे मुख्यमंत्री विठुरायाला साकडे घालण्यासाठी का म्हणून गेले?
दोन वेगळे विषय केवळ राजकारणासाठी जोडणे योग्य होणार नाही असे म्हणत आमच्या भावना सरळ आहे.त्त्या बाबत कुणीही राजकारण करायचे नाही! असा खणखणीत इशारा दिला.
एकही नारा,एकही नाम, जय जय श्री राम! अशा घोषणा देत युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिस मध्ये पत्रे पोस्ट केली.

याप्रसंगी मयुरेश नेतकर – जिल्हा अध्यक्ष ,भाजयुमो उत्तर रायगड, दिनेश खानवकर – सरचिटणीस ,रायगड उत्तर भाजयुमो, समीर कदम – मा सरचिटणीस,रायगड भाजयुमो, प्रशांत कदम – प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजयुमो, हॅपी सिंग – युवा नेते, विनोद घरत,अमर ठाकूर, विश्वजीत पाटील
निलेश वाडेकर,विक्रम ठाकूर,
रोहन वाजेकर,सचिन कुलकर्णी,भीमराव गेंद,सचिन पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.