रसायनीत व्यापा-यांकडून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन, व्यापा-यांचा आक्रोश
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने अंशतः लाॅकडाऊन जाहिर केले.आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक दि चेनच्या’नावाखाली संपूर्ण लाॅकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापा-यांचा आहे.
रात्री आठनंतर संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असे आदेश असताना आणि विकेंडला कडक लाॅकडाऊन असताना त्याआधीच मंगळवारी दुपारी नविन पोसरी-मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेत शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा-नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज झाले आहेत .त्यांनी बुधवार सकाळी दहा वाजता मोहोपाडा शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी सरपंच संदिप मुंढे,वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, भाजपाचे विभागप्रमुख सचिन तांडेल,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापा-यांनी मोहोपाडा बाजारपेठेत सोशल डिस्टिंक्शन पालून हातात शासनाच्या लाॅकडाऊनचे निषेध दर्शविणारे बॅनर घेऊन व्यापा-यांनी निषेध दर्शविला.यानंतर शिवाजी चौकात व्यापा-यांनी ठिय्या आंदोलन करुन लाॅकडाऊनचा निषेध केला.यानंतर मोहोपाडा व नविन पोसरी बाजारपेठेतील व्यापा-यांनी स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा प्रवेशद्वार कमानीजवळ रास्ता रोको केला.

याप्रसंगी काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.तर वावेघर बाजारपेठेतील व्यापा-यांनीही वावेघर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष तथा माजी उपसरपंच गुरुनाथ माली यांच्या मार्गदर्शनाखाली वावेघर प्रवेशद्वार कमानीसमोर रास्ता रोको करुन शासनाच्या लाॅकडाऊनचा निषेध दर्शविला.मोहोपाडा रसायनी परीसरात व्यापारी वर्गाकडून शासनाचा निषेध करुन घोषणाबाजी काही वेळ सुरू होती.तर या लाॅकडाऊनचा सलून व्यावसायिकांनीही निषेध दर्शविला.
लाॅकडाऊन लावणे योग्य नसल्याचे सांगून व्यापारी वर्गाने या लाॅकडाऊनला विरोध दर्शविला आहे.प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले आहे व करीत आहोत असे मोहोपाडा,नविन पोसरी व वावेघर बाजारपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी,सचिव अमित शहा,वावेघर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गुरुनाथ माली यांनी बोलताना सांगितले.

लाॅकडाऊनमुले आर्थिक संकट येईल.त्यामुले प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे. एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.अचानक दुकाने बंद केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.नोकरांचा पगार,दुकानाचे भाडे,कर्जांचे हप्ते या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची भावना व्यापा-यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Be First to Comment