सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / नवी मुंबई #
राज्यात कोरोनारुग्ण वाढत असले तरीही कोरोनामुक्त होण्याच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधे सर्वाधिक १ लाख ६५ हजार ६६३ रुग्ण महाराष्ट्रातले, तर त्याखालोखाल १ लाख १३ हजार ८५६ रुग्ण तामीळनाडूतले आणि १ लाख १ हजार २७४ रुग्ण दिल्लीतले आहेत म्हणजेच आपल्या येथील सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होत असून कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचा दरही ६२.८६ टक्क्यावर पोहचला आहे. नवी मुंबई पनवेल व रायगड क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमधून आजपर्येंत ५१५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून यामध्ये १३ वर्षांखालील १२ मुलांचा समावेश आहे. नवी मुंबईत परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. याबरोबरच नागरिकांनीही याबाबत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन करीत खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाच्या संकटावर निश्चितपणे मात करु तसेच आगामी काळात यादृष्टीने खबरदारी घेतल्यास नवी मुंबई परिसर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने व्यक्त केला. नवी मुंबई शहर पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वैयक्तिकरित्या या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. तसेच प्रतिबंधित उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, तसेच सोबतच मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग आदींचा वापर करावा असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने नागरिकांना केले आहे.
Be First to Comment