सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद #
कोरोना जागतिक महामारीमुळे राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे .सतत वाढत व लांबत चाललेल्या लाॅकडाऊनमुळे परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत चालली आहे. हातावर पोट असणारे व रोजंदारीवर जगणारे सर्व कष्टकरी घटक विशेषता शेतमजूर ,सर्व क्षेत्रातील हमाल मापाडी, माथाडी व कामगार, फळे भाजीपाला विक्रेते ,फेरीवाले ,हातगाडीवाले, सुतार, वायरमन, प्लंबर इत्यादी सर्व प्रकारचे कारागीर ,रिक्षा ,टॅक्सीचालक ,धोबी ,सलून, कोळी इत्यादी स्वरूपाचे सर्व बलुतेदार घटक ,छोटे दुकानदार ,मोलकरीण ते हॉटेल्स इत्यादी सर्व सेवा उद्योग सर्वसामान्य कर्मचारी व नोकरदार ,कनिष्ठ मध्यमवर्गीय या सर्वांचे जगणे कठीण झाले आहे .पिके वाया गेल्यामुळे आणि दुबार पेरणी मुळे शेतकरी संकटग्रस्त आहे. औद्योगिक क्षेत्रात पुन्हा नव्याने उभे राहणे हे सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना व काही प्रमाणात मोठ्या उद्योगांना ही प्रचंड मोठे आव्हान बनले आहे आणि राज्याच्या औद्योगिक व आर्थिक गाडे ई.स. 2020 या वर्षामध्ये तातडीने रुळावर येईल अशी परिस्थिती नजरेसमोर नाही .त्यामुळे राज्यातील 80 टक्के जनता हलाखीच्या अवस्थेत आहे. तिची आज उदरनिर्वाह करताना दमछाक होते आहे .उपासमारीची भीती सतावते आहे व त्यामुळे ती राज्य सरकारने राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज तात्काळ जाहीर करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा व जाहिरातबाजी केली पण प्रत्यक्षात काही महिन्यांचे रेशन ,धान्य सुरुवातीचे 500 ते 1000 रुपये व ईपीएफ वर्गणी म्हणजे अंदाजे दोन ते 2.5 लाख कोटी रुपये यापलीकडे गरिबांना थेट मदत कोणती नाही .उरलेले 18 लाख कोटी रुपये सर्व कर्जे आहेत आणि त्यांचा लाभ खरोखरीच्या गरजूंना मिळेल अशी परिस्थिती राज्यातील बँकांच्या व्यवहारात कोठेही दृष्टिक्षेपात मध्ये येत नाही .आज राज्यातील 80 टक्के जनता राज्य सरकारकडे अपेक्षेने पाहत आहे. या जनतेला व दुर्बल घटकांना थेट मदत करणे ,पॅकेज देणे आवश्यक आहे .
या नैसर्गिक व साधारण आपत्तीमधील राज्य सरकारने काय मदत केली असा प्रश्न आज राज्यातील जनतेच्या मनात उभा राहू लागला आहे तो जनतेच्या मनात रुजण्यापूर्वीचे सरकारनेच निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे .राज्य सरकारने अशावेळी मागेपुढे न पाहता तातडीने या सर्व घटकांना मदत करणारे पॅकेज जाहीर करावे अशी जनता दल सेक्युलर पक्षाची मागणी आहे .राज्य सरकारने आर्थिक पुनरुज्जीवन यासाठी सात मंत्र्यांची समिती नेमली आहे. शिवाय 11 तज्ज्ञांची समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल त्वरित घेऊन राज्यासाठी सर्वसमावेशक अंदाजे किमान एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज त्वरित जाहीर करावे .ही वेळ आर्थिक दृष्ट्या कसे देता येईल याचा विचार करत बसण्याची नाही .राज्याचा खजिना रिता आहे असे म्हणायची परवानगी नसते. संत दामाजीपंत ,
संत तुकाराम महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहू महाराज यांच्या आदर्श अनुसार रयतेला जगविणे आणि पुन्हा उभे करणे हे महत्त्वाचे आहे त्यादृष्टीने त्वरित निर्णय घेण्याची मागणी अॅड भोसले यांनी केली आहे.
Be First to Comment