Press "Enter" to skip to content

ठाकरे महापरिवाराचा व्यवसाय जमिनीचा आहे काय ? : किरीट सोमय्या

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔶🔶

‘ठाकरे महापरिवार अनेक ठिकाणी जमिनी विकत घेत आहे. ते का जमिनी घेतात? त्यांचा जमिनी खरेदी – विक्रीचा व्यवसाय आहे काय? असा प्रश्न पडला आहे. रायगड जिल्ह्यात ठाकरे महापरिवराने अनेक जागा घेतल्या आहेत. कोर्लई मध्येही त्यांनी जागा घेतल्या आहेत. कर्जत तालुक्यातही त्यांनी जागा घेतल्या आहेत. काही जमिनींच्या सर्व्हे नंबरचा दोन – दोन वेळा त्यांच्या सत्य प्रतिज्ञा पत्रात उल्लेख आहे म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्याना कुणी तरी फसवले आहे असे वाटते. ज्या कुणी त्यांना फसवले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे.’ अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज दि.20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी किरीट सोमय्यांनी कर्जत शहरातील विठ्ठल नगर मधील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, दीपक बेहरे, रमेश मुंढे, ऍड. हृषीकेश जोशी, किरण ठाकरे आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘कोरोना काळात उपाय योजना करण्याची जी आवश्यकता होती. ती सरकारने केली नाही. सर्वच शहरात तशी परिस्थिती होती. किरीट सोमय्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली. भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी मदत केली. कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी ही सोमय्या नेहमीच पुढे असतात. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या पत्नी सौ. वायकर यांनी रायगड जिल्ह्यात ज्या जमिनी घेतल्या आहेत त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आले आहेत.’ असे स्पष्ट केले.

सोमय्या पुढे म्हणाले, ‘कोर्लई येथील अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे व सौ. वायकर यांनी विकत घेतली आहे. ती मी आज पाहून आलो. या जमिनी त्यांनी का घेतल्या असा प्रश्न पडला आहे. ठाकरे महापरिवाराचा हा व्यवसाय आहे काय ? असे वाटते. तसे असेल तर त्यांनी तसे सांगावे. या बाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले पण अद्याप उत्तर मिळाले नाही. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील जमीनही ठाकरे महापरिवारातील सदस्यांच्या नावावर आहे. असे मुखमंत्र्यांनी आपल्या सत्य प्रतिज्ञा लेखात जाहीर केले आहे. पण वैजनाथ देवस्थानच्या जमिनीबाबत काही तरी गोंधळ आहे? अशी शंका येते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जतमध्ये आले असता आपण आमची सत्ता आल्यास पेण बँकेच्या ग्राहकांना न्याय देऊ असा शब्द दिला होता. त्याची प्रगती काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘पेण बँकेच्या जमिनी आहेत ते प्रकरण न्यायालयात आहे. असे उत्तर सोमय्यांनी दिले. तर कर्जत नगरपरिषदे मध्ये शिवसेना – भाजप युतीची सत्ता आहे. तेथिल कारभारावर तुमचे नगरसेवक काहीच बोलत नाहीत असा प्रश्न विचारला असता त्याबद्दल माहिती घेऊन सांगतो असे सांगितले तर जागृती पत संस्थे बाबत विचारले असता तेसुद्धा माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.