संस्कृत भाषेचे ” आधुनिक कालिदास ” रहातेकर सरांच्या साहित्यामुळे कर्जतच्या इतिहासात मानाचा तुरा ! 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷
संस्कृत भाषा पूर्वीपार चालत आलेली असून ती अवगत करण्यास अत्यंत कठीण असूनही या भाषेवर प्रभुत्व मिळवून आपल्या लेखन साहित्यामुळे कर्जतच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवणारे कर्जत तालुक्याचे संस्कृत भाषेचे “आधुनिक कालिदास ” की ज्यांचे लेखन – काव्य – साहित्य – विनोदी कुटप्रश्न – स्फुटलेखन राज्यभर प्रसिद्ध आहे. ज्यांचे शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान आहे, असे कवी श्री . सदाशिव त्रिंबक रहातेकर ( वय – ८६ वर्षे ) सर मात्र कर्जतच्या इतिहासात नजरेआड असल्याची खंत त्यांचे माजी विद्यार्थी सांगत आहेत .
ब्रिटिश काळातील शेवटच्या वर्षात ब्रिटिश कालीन पुस्तकांचा अभ्यास करणारे अभिनव ज्ञान मंदिर – प्रशाळेचे माजी विद्यार्थी श्री . सदाशिव रहातेकर सरांचे संस्कृत भाषेचे साहित्य शाळांत परीक्षेच्या संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेत व पाठ्य पुस्तकात त्याचा समावेश असणे , ही बाब कर्जतकरांसाठी अकल्पित असून अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेस गौरवोस्पद आहे . तसेच रायगडच्या मातीत जन्मलेल्या कर्तबगार पुरुषांच्या यादीत असणे अभिमानास्पद आहे .
सदाशिव रहातेकर सरांनी जवळजवळ २२ वर्षे संस्कृत भाषेचे लेखन केले आहे . त्यांचे हास्यप्रपात – ( सन – २०१४) , हास्यप्रवाह – (२०१६ व दुसरी प्रत २०१९) , काव्यप्रवाह – ( सन -२०१८ दुसरी प्रत – २०१९) तर चौथ्या साहित्याचे लेखन चालू आहे . त्यांचे संस्कृत साहित्य रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने प्रशांसित केली असून ती विश्वविद्यालय अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे . त्यांचे काव्यप्रवाह या पुस्तकातील उच्चकोटीतील विनोदी कुटप्रश्नांचा सन २०१८ -१९ च्या १० वी च्या संपुर्ण व संयुक्त संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे . तर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत देखील त्याचा समावेश केला आहे . शिवाय इतर राज्यातही स्फुटलेखनाद्वारे प्रसिद्ध आहे .
आजपर्यंत कर्जत ब्राह्मणसभा, सार्वजनिक वाचनालय , कर्जत नगर परिषद , मेडिकल असो . , जेष्ठ नागरिक संस्था , तसेच इतर सेवाभावी संघटनांनी त्यांचे सत्कार केला आहेत . ब्रिटिश काळात सन १९५१ – ५२ या वर्षात ११ वी तुन अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेतुन शिक्षण घेऊन संस्कृत भाषेला ” चांद – सितारे सारखे चमकवले , व संस्कृत भाषेचे “आधुनिक कालिदास ” म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर झाली , त्या सदाशिव त्रिंबक रहातेकर सरांचे अद्यापी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेने सत्कार न करणे म्हणजे एक शोकांतिकाच म्हणावी लागेल . तर रहातेकर सरांच्या “कूटप्रश्न ” शिकविणाऱ्या संस्कृत भाषेच्या शिक्षकांनी देखील त्यांचा आदरसत्कार न करणे हे ही एक आश्चर्यच आहे .
कूटप्रश्नाचे निर्माते रहातेकर सर हे कर्जतकर आहेत , याची माहिती देखील विद्यार्थ्यांना नसणे किंवा ती कळू न देणे म्हणजे “आधुनिक कालिदास ” रहातेकर सरांबाबत एक कटुनीतीच म्हणावी लागेल . अशा संस्कृत भाषेच्या अनमोल साहित्याचा व अविस्मरणीय काव्यांच्या निर्मात्यांचा कर्जतच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद होणे , ही काळाची गरज ठरेल . अद्यापपर्यंत रहातेकर सरांची कुठलीच नोंद न घेणाऱ्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेस माजी विद्यार्थ्यांनी लेखी कळवून खेद व्यक्त केला आहे .
Be First to Comment